शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी युसूफ पठाण
उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकावण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटारीचे ताबेदार मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (ए.टी.एस.) हत्येचा गुन्हा दाखल केला.
अंबानी कुटुंबीयांना देण्यात आलेली धमकी, मनसुख यांच्या मोटारीची चोरी आणि मनसुख यांचा मृत्यू या प्रकरणांचा तपास ए.टी.एस.कडे सोपवण्यात आला.
ए.टी.एस.ने या तीनही प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे मुंबई, ठाणे पोलिसांकडून ताब्यात घेतली.
तसेच मनसुख यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट देत त्यांच्या पत्नी विमला यांचा जबाब नोंदवला.
मनसुख यांची हत्या करण्यात आल्याचा संशय विमला यांनी व्यक्त केला.
त्यांचा संशय आणि मनसुख यांच्या शवचिकित्सेतून वर्तविण्यात आलेला प्राथमिक अंदाज या आधारे ए.टी.एस.ने सामायीक इराद्याने कट रचत हत्या, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला.
राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी त्यास दुजोरा दिला.
गेल्या आठवडय़ात अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ मनसुख यांची चोरी झालेली मोटार बेवारस अवस्थेत आढळली होती.
या गाडीत सुमारे अडीज किलो जिलेटिन आणि अंबानी कुटुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळली होती.
याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून मुंबई गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.
मात्र मनसुख यांची गाडी चोरणारे, स्फोटके दडवून ती गाडी अंबानी यांच्या घराजवळ ठेवणाऱ्यांबाबत मात्र कोणतीही ठोस माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली नव्हती.
विधानसभेत विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले.